पुण्यातील “गारवा बिर्याणी” च्या मॅनेजरचा खून; पुण्यात उडाली खळबळ

0
Spread the love

पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी

पुणे शहर पोलीस आयुक्तांनी कडक पाऊले उचलली तरी आज पुणे शहरात खूनाच्या घटना काही कमी होण्यास तयार नाही. तर शुल्क शुल्क कारणांवरून मुडदे पाडले जात असल्याने पुणेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सिंहगड येथील गारवा बिर्याणीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. हॉटेल मधून काम संपल्यानंतर दुचाकीवर घरी जात असलेल्या गारवा बिर्याणीच्या मॅनेजरवर अज्ञातांनी डोक्यात वार करुन त्यांचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसून हल्लेखोरांचा नेमका उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही.भरत भगवान कदम वय २४, रा.धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी असे खून झालेल्याचे नाव आहे.याप्रकरणी त्यांचा भाऊ प्रकाश भगवान कदम यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत कदम हे गारवा बिर्याणी येथे मॅनेजर म्हणून काम करत होते. शनिवारी रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावरील निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या रिकामे प्लॉट येथे हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले.

कोणत्यातरी हत्याराने त्यांच्या डोक्यात वार केले. त्यात ते तेथेच जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. याची माहिती धायरी मार्शल यांना मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मिळाली.सिंहगड रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तेव्हा भरत कदम यांचा मृत्यु झाल्याचे दिसून आले. तेथेच त्यांच्याजवळ त्यांची दुचाकी मिळून आली.

तसेच त्यांच्या खिशातील पैसे, पाकिट व अन्य साहित्यही तसेच होते. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने हा हल्ला झाला नसल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भरत कदम यांच्या खुनामागील नेमके कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत. सिंहगड रोड पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि सहायक पोलिस आयुक्त सुनिल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here