पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा.
पुणे सिटी टाईम्स ( PCT NEWS) प्रतिनिधी
पीएमपीच्या अध्यक्षांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने पीएमपी प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा मोठा बडगा उगारला असून ३० वाहक व ६ चालकांना निलंबित केले आहे. तर २ चालक आणि १ वाहकाला बडतर्फ करण्यात आले आहे.तर १४२ कर्मचाऱ्यांमध्ये ७८ वाहक ६४ चालकांना कडक शब्दांत नोटीसा दिल्या आहेत.
पीएमपीच्या ताफ्यात ९ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी संख्या आहे.त्यातील सुमारे २०० कर्मचारी मागील २ महिन्यांत निलंबित झाले होते. दरमहा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदभार घेतल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या बेशिस्तपणा त्यांना पहायला मिळाला. त्यांनी स्वतः मार्गावर अनेकवेळा पहाणी केली.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी आणि पुणेकर प्रवाशांना चांगली सेवा मिळावी, याकरिता सिंह यांनी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे . गाडी चालवताना फोनवर बोलणाऱ्या चालकांना १ हजार रूपयांचा दंड करण्यात येत आहे.
तर बेशिस्त चालक वाहकांची तक्रार करणाऱ्या प्रवाशांना १०० रूपये बक्षिस देण्यात येत आहे . आता सतत गैर हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबन, बडतर्फ आणि नोटीसा बजावून कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे बेशिस्त असलेले कर्मचाऱ्यांचे धाबे दणदणाले आहेत.




