हिंजवडी जमिनीच्या मोबदल्यासाठी वक्फ मंडळाचे बनावट ना- हरकत पत्राचे प्रकरण.
पुणे सिटी टाईम्स : प्रतिनिधी,हिंजवडी माण येथील राजीव गांधी इन्फोटेक साठी अधिग्रहण करण्यात आलेल्या जमीनीच्या मोबदला प्रकरणातील गैरव्यवहारातील एक आरोपी साहिल मुन्ना खान तसेच रेहाना इशराक खान आणि उझेर इशराक खान यांचे अटकपूर्व जामीन अर्ज पुणे येथील सत्र न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.
सुमारे ९ कोटी ६४ लाख रुपये मोबदला मिळणार असलेल्या वक्फ संस्थेचे ट्रस्टी असल्याचे खोटे सांगून तसेच पुराव्या दाखल वक्फ मंडळाचे बनावट ना हरकत पत्र सादर करणाऱ्या आणि त्यापैकी सुमारे ८ कोटींपेक्षा अधिक रक्कम परस्पर हस्तांतरित करणाऱ्या इम्तियाज शेख तसेच चांद मुलाणी तसेच इतर आठ या आरोपीं पैकी साहील मुन्ना खान तसेच रेहाना इशराक खान आणि उझेर इशराक खान यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करतांना सदर प्रकरणात आरोपपत्र (chaegesheet) दाखल झालेले असल्याने अटकपूर्व जामीन मिळावा असा बचाव घेतला होता.
न्यायालयाने त्याचे म्हणणे फेटाळून लावत सरकारी वकील ऍड. गेहलोत व मूळ फिर्यादी असलेल्या महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे विशेष वकील ऍड. समीर शेख यांचे म्हणणे मान्य करत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. आरोपपत्र कायद्यातील तरतुदीनुसार मुदतीत दाखल केले गेले असले तरी या प्रकरणाचा तपास सुरूच राहील व सखोल तपास झाला पाहिजे असे देखील न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
यातील सुमारे ९०% पेक्षा अधिक रक्कम रक्कम बंडगार्डन पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ निरीक्षक व सध्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री यशवंत गवारी व त्यांच्या टीम मधील अधिकारी व पोलिसांनी आतापर्यंत वसुल करून बँकेत जमा केल्याने पोलिसांचे देखील सर्वत्र कौतुक झाले आहे. तसेच हे फार मोठे आणि विस्तीर्ण स्वरूपाचे प्रकरण असल्याने सक्तवसुली संचानालय (enforcement derectorate) देखील यावर लक्ष ठेवून आहे.
या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी ईशराक अब्दुलगनी खान याला पुणे येथील न्यायालयाने या पूर्वीच फरार घोषीत केले आहे.सदर घोटाळ्यातील सूत्रधारांनी देवाला देखील सोडले नसल्याची चर्चा असून या मागचे मोठे धेंड बाहेर आले पाहीजे अशी मागणी जनतेतून होत आहे.